Jul 19, 2018

कविता बाराच्या भावात

पुस्तकांच्या दुकानात
       एक कवितासंग्रह दीडशे कवितांचा.
किंमत किती?
        अवघे एकशे चौतीस रुपये. बापरे!
म्हणजे एक कविता
        सुमारे एक रुपया बारा पैशांना.
अगदी मर्ढेकरांची
       अन् इंदिरा संतांची सुद्धा...

मध्यमवर्गीय माणूस विचार करतो, काय घेऊ?
-एक कवितासंग्रह?
-दोन पिझा स्लाईसेस?
-एक तासाचा योगा क्लास?
-दोन लीटर पेट्रोल?
-एक सिनेमाचे तिकीट?
-दोन ड्रिंक्स की
सहा भेळीचे पुडे?...

सुख, दु:ख, प्रेमभंग,
      विरह, जन्म, मृत्यू,
तारुण्य, वार्धक्य, संसारचिंता
      हे तर सर्वांनाच अनुभवायला मिळते.
ते शब्दांत मांडून त्याचा
     अनुभव तर टाळता येत नाही आणि
तेच तेच उगाळून मन:शांतीही लाभत नाही.
      मग काय करायच्यात कविता अन्
नको त्या जीवनाच्या चिंता?

हे कवि लोक असा काही आव आणतात की
       सुख दु:ख फक्त त्यांनाच होते.
जणू काही कमळाचे फूल त्यांनाच प्रथम दिसते.
       अन् प्रिय व्यक्तीच्या वियोगाचा योग
जणू काही त्यांच्याच पत्रिकेत फक्त असतो.

मग त्या उघड्या भावनांच्या प्रदर्शनासाठी
       मी कशाला पैसे मोजू?
उगाचच विकतचे दुखणे,
       अन् फुकटच्या चिंता!

त्यापेक्षा
     १ लीटर पेट्रोल घेतो,
     २ भेळीचे पुडे, १ मोगरीचा गजरा,
     २ आईस्क्रीमचे कोन घेतो.
     बायको खूष होऊन जाईल!
...

नंतर काही वर्षांत
     एक कविता आठ आण्याला विकली जाते.
अन् मग कविही कवितासंग्रह
     करण्याच्या भानगडीत न पडता
बी. एड, एम. एड, वगैरे करून
     शिक्षक होऊन मोकळा होतो.
कवितेचा "भाव" दोन्ही अर्थांनी घसरतो.

एक दिवस कवि सारसबागेत
      अर्ध्या सुक्या भेळीचा पुडा घेतो.
त्याच्या लहानग्या मुलीच्या हट्टापायी.
      अर्धी भेळ किती, तर बारा रुपयांची.
अन् भेळीच्या पुडक्याचा कागद तो कोणता?
       तर वर्तमानपत्रातील कुसुमाग्रजांच्या
"कोलंबसचे गर्वगीत" कवितेचा.
       ते पाहून कवि सद्गदित होतो.

घरी येऊन "बाराच्या भावात कविता "
      नावाची जी कविता तो करतो
तिची किंमत त्याच्यालेखी अमूल्यच असते.
      मग जगाच्या लेखी ती शून्य का असेना!

No comments:

Post a Comment