Nov 30, 2017

चार दिवस चार कविता- भाग १

"चार दिवस चार कविता" ह्या सदरात मला बोलावल्याबद्दल सर्वप्रथम अनुजाला आणि हिमानीलाही धन्यवाद ! तर ओळीने चार दिवस तुमचे मनोरंजन करण्याची दुर्मिळ संधी मला प्राप्त झाली आहे; त्याबद्दल मी आभारी आहे. अशी आशा करते की, माझ्या लिखाणामुळे तुम्हाला फार कंटाळा येणार नाही. आलाच तरी चारच दिवसांत तुमची सुटका होईल ! आजच्या दिवसाची सुरुवात माझ्या आजोबांनी लिहिलेल्या एका भजनाने करते.

सगुण निर्गुणा मायाधीशा
ब्रह्माविष्णु महेश परेशा |
दुष्ट वृत्तींचा करुनि विनाश
शांतिसौख्य देई जगतास ||

हे आणि इतर कित्येक भजने, आर्या, साक्या, दिंड्या, पदे, इत्यादी ऐकता ऐकताच मी लहानाची मोठी झाले. कवितेशी माझा पहिला परिचय माझ्या अप्पा आजोबांमुळेच, ज्येष्ठ कीर्तनकार वासुदेव कोल्हटकर ह्यांच्यामुळेच, झाला. दुर्दैवाने मी जन्माला येण्याअगोदरच आजोबा वारले. पण त्यांनी रचलेल्या शेकडो कविता आई बाबांमुळे लहानपणीच कानावर पडल्या. अप्पा आजोबांच्या कीर्तनांविषयी आज काही लिहिणार नाही. त्या विषयाचा अवाका फारच मोठा आहे. पण कीर्तनाव्यतिरिक्त ते फार मोठे लेखक, कवि आणि आयुर्वेदाचार्य होते. रोजच्या कीर्तनाला रोज नवी कविता ते स्वत: करत असत. अगदी लीलया. अभंग भारत, अभंग भागवत, कीर्तनकला आणि शास्त्र, अभंग योगवासिष्ठ, इत्यादी विविध ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांच्या केवळ योगवासिष्ठ ग्रंथातच अभंगांची संख्या सुमारे २९०० इतकी आहे. त्यांची कविता अगदी सहज, सुंदर आणि मनाला भावेल अशी आहे. विद्वत्ता मोठी, त्यामुळे बरेचदा संस्कृतचा पगडाही त्यांच्या भाषाशैलीत जाणवतो. पण कविता मुख्यत्वे मराठमोळीच. आजोबांच्या कवितासमुद्रात आवडत्या कविता शोधण्याचे काम खूपच कठीण, किंबहुना अशक्य आहे. पण उदाहरणादाखल आज मी त्यांनी लिहिलेला एक पोवाडा आणि एक पद सादर करणार आहे.

१. तानाजीचे वर्णन

तानाजी मोठा बलवान | धिप्पाड मान
विस्तीर्ण भाळ | स्वरूप विक्राळ हा जी जी जी ||१||
दंडासारख्या मिशा गुलढब्बु | त्यावरी लिंबु |
राहे सुढाळ | हृदय वीशाळ हा जी जी जी ||२||
हत्तीचे धरुनिया सुळे | उभा करि बळे |
वीर्य तेजाळ | कर्दनकाळ हा जी जी जी ||३||

लहानपणी हा पोवाडा म्हणताना आम्हा मुलांना फार मजा यायची. त्यावेळेस मला "गुलढब्बु" शब्दाने खूप हसू यायचे. हा शब्द मी आजतागायत इतरत्र कुठेच पाहिला नाही. तो शब्द आजोबांनीच शोधला की काय, काय माहीत? तसेच पोवाड्यात "जी, जी, जी " म्हणतात त्याचीही मला गंमत वाटायची. आणि मिशीवर लिंबू ठेवता येईल एवढी मिशी कशी दिसत असेल ह्याचे चित्र मी मनात रंगवी. मला आठवते, माझी बहीण कल्याणी हिने हा पोवाडा शाळेत सुंदरपणे गायला होता. तेंव्हा तिच्या काही मैत्रिणी नुसते "जी जी जी" मागे उभे राहून म्हणत होत्या.

२. दुसरी एक अगदी वेगळ्या विषयावरची कविता
हे पद त्यांच्या "राजा गोपीचंद" ह्या आख्यानातले. गोपीचंद हा भारताच्या पूर्वदिशेस असलेल्या गौडबंगाल प्रदेशाचा राजा. वडील (त्रिलोचन) लहानपणीच गेल्याने गोपीचंदाला बालपणीच राज्यकारभार करावा लागला. गोपीचंद राजा मोठा रसिक. त्याचे स्नानही मोठे थाटामाटात दासींकडून होत असे. ते पहाताना एकदा त्याच्या आईच्या, म्हणजे मैनावतीच्या, डोळ्यात एकदम पाणी आले. प्रथम आपल्या मुलाला पाहून तिला आपल्या दिवंगत पतीची आठवण आली आणि आपल्या पुत्राचे थाटामाटाचे स्नान बघून आपला मुलगा केवळ संसारातच गुरफटून गेला तर त्याला संसाराची क्षणिकता कळेल का नाही, असे भय तिला वाटले. त्या प्रसंगी ती गोपीचंदाला म्हणाली :

जल बुदबुदसम प्रपंच क्षणिक बालका |
लुकुलुकु करिताचि गळुनि जाय तारका ||
कमलदलावरिल सलिल तरल ज्यापरी |
जीवित मजलागी दिसे क्षणिक त्यापरी ||
अनुभव तुजलागी अजुन हा न येई का |
लुकुलुकु करिताचि गळुनि जाय तारका ||१||
बाळ तुझे तात उभे पुढती राहिले |
पाहुनि तव कांति मनी स्मरण जाहले ||
सुंदर तनु धगमग करि लोम पेटले |
मम सन्मुख प्रबळ नृपति धुळीस मिसळले ||
अनुभव तुजलागी अजुन हा न येई का |
लुकुलुकु करिताचि गळुनि जाय तारका ||२||

अशाच नानाविध विषयांवर आजोबांच्या हजारो, लाखो कविता.आजोबांच्या स्मृतीस विनम्र वंदन करून पुढील भागात बाबांनी केलेली एक कविता सादर करेन.

-रत्नधा

चार दिवस चार कविता- भाग २

हिमानी आणि अनुजा ह्या नात्याला जरी चुलत बहिणी असल्या तरी सख्ख्याच आणि सख्याच ! त्या प्रभात रोडला रहायला आल्यापासून तर आमचे जाणेयेणे रोजचेच झाले. वयाने सर्वात मोठी मी, मग हिमानी, अनुजा आणि शेंडेफळ वरदा. सर्वांचा स्वभाव, कार्यक्षेत्र अगदी वेगळं वेगळं. पण मला वाटते, कॉमन गोष्ट ही की आम्ही सगळ्या तितक्याच "crazy" आहोत. आमच्यापैकी काहींना हसता हसता रडू येते आणि रडता रडता हसू ! आज चौघी चार दिशांना असू. कदाचित् एकमेकांच्या सगळ्या गोष्टी एकमेकींना माहीतही नसतील. पण आम्हाला त्याची पर्वा नाही कारण त्या सर्व गोष्टींच्या पलीकडे आम्ही एकमेकींना ओळखतो. गोष्टी काय येतील जातील, पण आमच्या नात्यातला गोडवा तसाच राहील.

बहिणी माझ्या जीवाभावाच्या
मैत्रिणी सुंदर सुखदु:खाच्या
हाकेविनाही धावुनी येणा-या
हवेनको ते समजुनी घेणा-या
बालपणीचा काळ सुखाचा
गोड बहिणींच्या निखळ मैत्रीचा

जसे आम्हाला आमचे नाते जवळचे, तसेच सर्व काका-आत्यांनाही सगळे जवळचे. माझ्या बाबांना माझी बहुतांशी चुलत भावंडे "बाबा" अशीच हाक मारतात आणि हिमानीच्या बापूंना मीही "बापू काका" अशीच हाक मारते. आणि बापूंनी शब्दांत जरी मान्य केले नाही तरी मला माहीत आहे की मी त्यांची "लाडकी पुतणी" आहे. पुरावा कशाला पाहिजे ? मी दरवेळी पुण्यातून कॅनडात निघताना, माझा निरोप घेताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. दरवेळेसच काय ते अश्रू डोळ्यांत धूळ गेल्याने आले नव्हते, होय ना बापू ? शास्त्रीय संगीत आणि लिखाण ह्यांचे मला थोडेफार प्रेम असल्याने बापूंचे आणि माझे एक वेगळे नाते आहे, असे मला वाटते.
बाबांनाही सर्व पुतणे-पुतण्या मुला-मुलींसारख्याच. घरांतल्या मंगल कार्यांत, उदाहरणार्थ, लग्ने, डोहाळजेवणे, बारशी, मुंजी, ह्यांच्यात बाबांनी कौतुकानी पुष्कळांसाठी कविता केल्या. मंगलाष्टके, अंगाईगीते अनेकदा रचली गेली. आजोबांप्रमाणे बाबाही कीर्तनकार आहेत, आणि त्यांनीही कीर्तनासाठी पुष्कळ कविता आजवर केल्या.
आज मी तुम्हाला तीन कविता सादर करणार आहे. पहिली बाबांची, दुसरी आईची आणि तिसरी माझी. ह्या तिन्ही कविता अगदी वेगवेगळ्या विषयांवर आहेत.

कविता १. ही कविता बाबांनी हिमानीच्या बारशाच्या वेळी लिहीलेले एक गोड अंगाईगीत आहे. हिमानी जेंव्हा "चंद्रवदन पाडस" होती तेंव्हा मी फक्त एकच वर्षाची असल्याने त्यावेळचे ते गोंडस बाळ मला आज आठवत नाही. तरी हे पाळणागीत मात्र कोल्हटकरांच्या व इतर पुष्कळ बाळांसाठी नंतर बरेचदा गाईले गेले.

अंगाईगीत

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

दिनराज घरी परतला पाखरे जाती कोटरा
किलबिलाट मंदावला चांदण्या नभा बिलगल्या
तो रक्तरंग लोपला पसरिते राज्य आपुले निशा ||१||

तृणबाळ वनी पहुडले अरविंद पापण्या मिटे
तारांगण फुलुनी उठे चंद्रबिंब आल्हाद ते
तो रत्नखचित पाळणा झुलवितो विश्वदेव राजसा ||२||

हे गाल खोब-यापरी नक्षत्रवरी जांभुळी
गाभुळल्या ओठावरी कुतुहली अंगुली न धरी
टकटका बघोनी तुला होतसे जीव कसा कसनुसा ||३||

मऊमऊ पाय पसरुनी अवनीच्या अंकावरी
तृणबाळ पहा गोजिरी द्वंद्वहीन निद्रा वरी
अंगाई गीत सागरा गाऊनी जोजवी या पाखरा ||४||

तो पूर्वज बलतपनिधि प्रपिताही तेजोनिधि
तो तात पहा वात्सल्ये तुजसाठी श्रमतो किती
हे कौशिकतपकौमुदा अर्थ दे आप्तवृंद आशिषा ||५||

हे गंध नवे तुज जरी क्षणभरी दूर त्या करी
मखमली जादुच्या उरी लवलवते हिरवे जरी
सांभाळी तूचि तुला थोपवी नव्या जगाची नशा ||६||

हे चंद्रवदन पाडसा नीज घे चांदण्यातल्या सशा ||

कवि: वामन कोल्हटकर (१९७८)

कविता २. खालील कवितेवरून माझी आई मनातून किती romantic होती हे कळेल. आई, ही कविता तुला सर्वांबरोबर शेअर करायची नसेल, तर मला खरंच माफ कर. पण आज "साहित्य" ह्या दृष्टीने मी ती शेअर करत आहे.आणि ती सर्वांना नक्कीच आवडेल. मला असे वाटते,आई बाबा आजकालच्या भाषेत सांगायचे तर "dating" करत होते तेंव्हाची म्हणजे सुमारे ५०-५५ वर्षांपूर्वीची ही कविता असावी. ह्या कवितेचे शेवटचे कडवे मला विशेष आवडते.

शिकविलेस मजला 

शिकविलेस तूं मजला
अस्फुटशा ओठांतून
गीत कसे गुंफावे
मोहकशा शब्दांतून ||१||

शिकविलेस तू मजला
धुंद, गूढ स्पर्शातून
गंध कसा बोलांनो
आणावा हृदयांतून ||२||

शिकविलेस रंगांतून
विश्व नवे उजळाया
अंतरीची आंच पुरी
आर्त स्वरी ओताया ||३||

शिकविलेस अर्पाया
जीवन प्रीतीस्तव
रम्य चांदण्यात, अहा
विसराया देहभाव ! ||४||

शिकविलेस हे सारें
शिकविलें न एक तूं
जीव कसा जगवावा
तुजवांचून, तुजवांचून ! ||५||

-कवयित्री: द्योतना कोल्हटकर

कविता ३. कविता करण्याच्या प्रांतात मी नवशिकी आहे. सुमारे वर्षापूर्वीपासून हा छंद जडत आहे. त्यामुळे माझ्या कवितेला आजोबा, आई आणि बाबा ह्यांसारख्या सराईत मंडळींच्या कवितांची सर येणार नाही. तरीही प्रयत्न केला आहे एवढेच ! आई गेल्यानंतर सुमारे २-३ महिन्यांनी, तेंव्हाच्या मानसिकतेत ही कविता लिहिली गेली.

आयुष्याची गाडी

झुकुझुकु जाई,आयुष्याची गाडी
मला न ठावे कुठे वळण घेई
क्षणी इथे, क्षणी तिथे मारी उडी
सुखदु:खाच्या रुळांवर परिक्रमा करी

अरे पहा ते डोंगर, अहा पहा ती नदी
खिडकीतुनी दृष्ये सारी सुंदर दिसती
नका पडु मोही, रूपे क्षणिक असती
क्षणार्धात् पहा कशी लुप्त ती होती

आगगाडीत माझ्या बहुत प्रवाशी
इच्छुकनिरीच्छुक सारे यात्रा करी
कुणा न ठावे कुणी कुठुनी येई
कुणा न ठावे कुणी कुठेही जाई

अज्ञानात कोणी आनंद घेई
ज्ञानी यात्रिकही ज्ञानाने मोही
योग्यायोग्याने कुणी संभ्रमात पडी
त्रयस्थयोग्याला मी कुठे शोधी

झुकुझुकु जाई, आयुष्याची गाडी
अचानक कशी बिघडुनि जाई
तिला लागे पळाया चैतन्यइंधन
आवडे तिला सुखदु:खाचे बंधन

काही रुळ सारे सुखाचे असती
गाडी तिथे कशी भरधाव जाई ?
जिथे रुळ मात्र दु:खाचे असती
तिथे गाडी कशी धिमीधिमी जाई ?

झुकुझुकु जाई, आयुष्याची गाडी
सुखदु:खाच्या रुळांवर विसावा घेई
बांधा बिस्तरा, आपुले स्थानक येई
आगगाडीस आता मी दुरूनच पाही

-रत्नधा (फेब्रुवारी २०१७)

उद्या परत भेटू!

चार दिवस चार कविता- भाग ३

जुनी पिढी- नवी पिढी

काही महिन्यांपूर्वी पुण्यात गेले होते तेंव्हा बाबांना कळलं की मला नुकताच कवितेचा छंद लागला आहे म्हणून. आणि त्यांनी चक्क मला कवितांची काही पुस्तके भेट म्हणून दिली. मला म्हणाले, "आठवणीतील कविता ह्या पुस्तकाचे चार भाग घे आणि इंदिरा संत ह्यांचेही काही काव्यसंग्रह घे. तुझ्या आईला इंदिरा संत फार आवडायच्या. इतरही जी पुस्तके तुला आवडतील ती घे ". वरील वाक्यात मी "चक्क " हा शब्द वापरला ह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण तुमच्यापैकी जे कुणी लोक सिनिअर कोल्हटकरांना ओळखतात त्यांना साधारण कल्पना असेल की ह्या मंडळींना आपल्या मुलांना गिफ्ट देणे, शुभेच्छा देणे, त्यांच्याशी चार गोड शब्द बोलणे, त्यांची स्तुती करणे, त्यांना आय मिस यु, आय लव्ह यु, वगैरे तत्सम काहीसे बोलणे ह्यांची कडकडीत "allergy" आहे. म्हणजे ते पुस्तके वाचायला देतील पण त्याला "गिफ्ट" असे म्हणणार नाहीत. हे मी जे काय लिहीले आहे ते वाचल्यावर ही मंडळी म्हणतील, " त्यात काय म्हणायचंय ? हिचं उगाचच आपलं काहीतरी !"

वाढदिवसाला गिफ्ट वगैरे तर अशक्यच ! ती झाली परदेशी प्रथा. गोड गोड बोलणे, मिठी मारणे, कौतुक करणे, असे काही केले तर "मराठी संस्कृती" कशी काय जपली जाईल ? त्यातून मला माहीत असलेले थोर कोल्हटकर लोक हे रागीटपणा, दिलदारपणा, विक्षिप्तपणा, क्वचित् निर्दयता तर क्वचित् नको इतका हळवेपणा, चांगुलपणा, इत्यादी अनेक विरोधी गोष्टींचे अजीब समीकरण आहेत. तुमच्या पैकी कुणाला जर "थोर कोल्हटकर पुरुष" व्हायचे असेल तर खालील नियमांचे कटाक्षाने पालन करावे:

१. नियम को. ह्या नियमाचा गाभा "कोप" किंवा "क्रोध" ह्या शब्दात आहे. क्रोध हा वेळोवेळी प्रदर्शित करण्यासाठीच असतो. कधीही तो प्रकट करावा. त्यासाठी तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त, इत्यादी पाहू नये. त्याबाबत अजिबातच संकोच किंवा मनाची चलबिचल करू नये. प्रेम हे वाटले तर करावे. पण ते ओठांवर कधी आणू नये. शब्दांत मांडावेसे वाटले तर जास्तीत जास्त ते कवितेत लिहावे. किंवा शास्त्रीय संगीतात, कीर्तनात, व्याख्यानात सांगावे, ऐकावे. प्रेमासारखे क्षुद्र विषय बोलताना टाळावेत. कुणी त्याबाबत बोलत असेल तर तिथे दुर्लक्ष करावे. प्रेमाबाबत संदिग्ध असावे. इतरांची मने जाणून घ्यायच्या व्यर्थ भानगडीत पडू नये. मानापमान योग्य रीतीने सांभाळावा. म्हणजे, मान हा स्वत:चा राखावा आणि अपमान हा दुस-याचा करावा.

२. नियम ल्ह. बालपणच्या मित्राच्या कुठेतरी वेल्ह्याला रहाणा-या मामेभावाच्या शेजारणीच्या चुलतसासूच्या विहीणीचा सावत्र नातजावई शिंदे आळीत जरी ओझरता भेटला तरी त्याला आयत्या वेळी सहकुटुंब घरी जेवायला घेऊन यावे. आयुष्यात किमान चारपाचशे मित्र तरी करावेत (फेसबुक फ्रेंड नाहीत, खरेखुरे मित्र, की जे जेवायला कधीही घरी टपकू शकतील असे). ह्या आयत्या वेळी जेवायला येणा-या मंडळींची पूर्वसूचना बायकोला देण्याचे महापाप अजिबातच करू नये.

३. नियम ट. राग आल्यावर इतरांना टरफलासारखे वागवावे. लहरी असावे. चर्चेत नेहमीच पुढाकार घ्यावा. कथकली-कुचिपुडी नृत्य, न्यूटन, गाऊस, शंकराचार्य, कीर्तन, मल्याळी भाषा, संस्कृत, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, अरुणा ढेरे, विश्वामित्र, दधिची, इराणमधील अत्तरे, क्युबेक मधील फ्रेंच आणि इंग्रज ह्यांच्या लढाया, गणित आणि मुस्लीम धर्म ह्यांचा संबंध, साहित्य, कला, नारायण नागबली, त्रिपिंडी, विषय कोणताही असो. आपण चर्चेत नेहमीच अग्रेसर असावे. क्वचित् कधीतरी एखाद्या विषयाची माहिती नसेल तर जास्त जोरात बोलून बेधडकपणे आपले मत मांडावे. म्हणजे ते इतरांना खरे वाटते.

४. नियम क. ह्या नियमाचा गाभा "केकाटणे" ह्या शब्दात आहे. क्रोध प्रदर्शित करताना दिलखुलास केकाटावे. मुळमुळीतपणा अजिबात दर्शवू नये. मग समोरची व्यक्ती कल्हईवाला, भाजीवाला, बांधकामवाला, भंगारवाला, विद्यार्थी, सरकारी ऑफिसर, बॅंक manager, वॉचमन, मंत्री, संत्री, कोणीही असो. कुणाचेही (विशेषत: स्वत:च्या मुलांचे) कौतुक शक्यतो करू नये. आपल्या मुलांच्या शिक्षणात जास्त ढवळाढवळ करू नये. त्यांना जे जे व्हायचे आहे ते ते होऊ द्यावे. काही झाले तर झाले, नाहीतर नाही.

५. नियम र. रामनामाचा जप हवा असेल तर करावा. त्याची बळजबरी नाही. पण ह्या ना त्या मार्गे आत्मज्ञान प्राप्त करावे. भारतीय संस्कृती व इतर देशांच्या संस्कृत्याही जमतील तितक्या आपणच जपाव्यात. मुक्ती ही मिळवण्यासाठी असते. संसारचक्र हे त्यातून बाहेर पडण्यासाठी असते. तपश्चर्या केली नाही तर आपणा सर्वांना मुक्ती तरी कशी मिळेल ? सोमवारी जर ज्ञानेश्वरांची, तुकारामांची स्तुती केली तर मंगळवारी त्यांची निंदा करावी. कुठेही गुरफटून जाऊ नये. अगदी सोमवार-मंगळवारातही. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मंगळवारी तुकारामांची स्तुती करावी व बुधवारी त्यांची निंदा करावी. अभ्यास मात्र करावा. नाही तर ईश्वरतत्त्व कसे काय कळेल ? ब्रह्म कोण जाणून घेईल ? अफाट वाचन करावे. मोठमोठे विद्वान, पंडीत ह्या लोकांशी मैत्री ठेवावी.

वरील को,ल्ह, ट, क आणि र नावाचे पाच नियम जो भक्तिभावे हररोज नेटाने आचरणात आणेल, त्याला जलदच "कोल्हटकरत्व" किंवा "कोल्हटकर पद" प्राप्त होईल. आणि हे गुण तुमच्यात जर आधीच असतील, तर त्वरित आपले आडनाव बदलून "कोल्हटकर" असे ठेवावे.

असो. थट्टा पुरे.

गोड शब्द न वापरण्यात मराठी माणसाचा दोष जास्त नसावा. मराठी भाषेतच ह्या गोड गोड शब्दांची, रीतीरिवाजांची कमतरता असेल. ह्या G-vitamin deficiency (गोड शब्दांची कमतरता) मुळेच मी ५-६ वर्षांची असतानाच "मुग्धा गोडबोले" नावाची एक गोड मैत्रीण केली. त्यावेळी गोड शब्दांची तीव्र गरज असल्याने मला "मारणे", "कुदळे", "कानशिले", "धोपटकर", "जमदग्नि", "दुर्वास", इत्यादी आडनावांच्या मैत्रिणी करणे शक्यच नव्हते. कुठूनतरी चार प्रेमळ शब्द तातडीने मिळवायचे होते. प्रश्न जीवनमरणाचा होता. त्यामुळेच "गोडबोले " आडनाव म्हणल्यावर एक गोड गुलाबी आशा वाटू लागली. जणू वाळवंटातले oasis सापडले. तशी मुग्धा खूप गोड गोड वागलीही. अजूनही वागते. पण आता समस्त झी मराठी टी.व्ही. मालिकांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्यात ती व्यस्त असते. तिच्यावर आता फारच मोठी जबाबदारी आहे. तरी अजूनही स्वप्नात येऊन मिठीच काय मारून जाते आणि गोड गोड काय बोलते. दूर दूर देशीही इतरांच्या स्वप्नात भल्या पहाटे बेधडक जाण्याची कोणती दिव्य शक्ती तिच्यात आहे काय माहीत ! कसं गं जमतं मुग्धा हे तुला ?

आमच्या बाबांचे सांगायचे झाले तर त्यांना कोणीही फोन केला तर कधीतरी "नमस्कार" म्हणतील, पण इतर काही वेळी एकदम जोराने "बोला !" असे ओरडतील. मग फोन करणा-यालाच बोलू की नको, आत्ता बोलू की नंतर बोलू, नक्की काय बरं बोलू, मला खरंच काही महत्वाचे बोलायचे होते का, अशा अनेक शंकाकुशंका मनात येऊ लागतील. फोन करणारा जर गुळमुळीत असेल तर घाबरून फोन ठेवूनच देईल. "बाबा तुमची आठवण आली," असे काहीसे त्यांना म्हणाले तर कधीकधी नुसते "हुं" असे म्हणतील. नुसत्या "हुं" चा अर्थ मला कधीच कळत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला प्रत्यक्षात पहावे लागते. "हुं" करताना समोरच्याच्या चेह-यावर स्मितरेषा असेल तर आपण बोललेले म्हणणे आवडले, असे समजायचे नाहीतर "हुं" चा अर्थ दरवेळी बदलतो. (काही "हुं" चे अर्थ खालीलप्रमाणे: अगं बाई बास कर आता, मग मी काय करू ?, काय माहीत ?, चालायचंच, असं का?, जाऊदेत, गप्प बस, आवरा आता, ताबा ठेव स्वत:वर, ...ही यादी फार मोठी आहे). "हुं" चा अर्थ फोनवरच्या बोलण्यात कधीच पडताळून पहाता येणार नाही. "हुं" ची भाषा चायनीज भाषांपेक्षा अवघड आहे. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक "हुं" चा प्रत्येक अर्थ वेगळा असतो, हे मी का तुम्हाला सांगायला हवे ?

त्यातून चेह-यावरूनही "हुं" चा अर्थ समजेलच असे नाही. काही लोकांच्या चेह-यावर सारखेच हास्य असते. उदाहरणार्थ माझ्या बाबांचा लहानपणचा एक मित्र. अगदी घरच्यासारखाच. त्याला आपण किशोर काका म्हणूयात. (काकाचे नाव ह्या लेखासाठी बदलले आहे.) तर हा किशोर काका सततच हसतो. प्रसंग बरावाईट कसाही असो, तो हसतोच ! मग त्याच्या "हुं" चे अर्थ कसे कळणार ? त्याला मी कसे समजून घ्यायचे? तो कायमच आनंदीच असतो का ? असे कसे शक्य आहे ? का तो सुखदु:खाच्या पलीकडे गेला आहे ? का हसणे त्यांच्या खानदानातच अनुवंशिक आहे ? का हसण्याचा अर्थ कधीकधी रडणे असाही असतो ? का त्याला सतत ब्रह्मानंद होत असतो किंवा त्याला "कोsहम् ? सोsहम् !" ची अनुभूती सततच येत असते ? का तो स्थितप्रज्ञ असतो ? बघा ना, त्याच्या सततच्या हसण्याने मला कितीतरी प्रश्न पडले आहेत. त्याला कसे वाटते, की काही वाटतच नाही, की काहीतरी वाटण्यासाठी त्याच्याकडे वेळच नाहीये ? किशोर काका, तुला मी कसे काय समजून घ्यायचे रे ?

आमची आई पण फार काही वेगळी नव्हती. मला विचाराल तर बाबा आईपेक्षा फारच प्रेमळ आहेत. कितीतरी वेळा आईला मी सांगायचे की आई, मला पत्र, इमेल लिहिताना पत्राची सुरुवात "प्रिय रत्नधा " किंवा "लाडक्या रत्नधे" अशी काहीतरी प्रेमळपणे करत जा. आणि पत्राच्या शेवटी मिस यु, लव्ह यु किंवा रत्नधा तुझी फार आठवण येते असे कधी कधी म्हणलेस तरी चालेल. असे काहीसे सुचवले की ती नुसती हसायची किंवा "हुं" ची भाषा वापरायची. पुढची इमेल आली की नुसती 'रत्नधा' अशीच सुरुवात व्हायची. प्रिय वगैरे आधी काही नाही. मग आठ इमेल मध्ये एकदा कधीतरी एकदा प्रिय रत्नधा म्हणून जायची.

असो. थोडक्यात मला असे म्हणायचे आहे, की मनातले भाव कधी ओठांवर आलेच नाहीत तर ते कसे काय समजणार ? काही भाषांमध्ये जशी काही अक्षरे silent असतात तसे मराठी भाषेत काही भाव silent असतात, असे समजायचे का ? ह्या काही मराठी मंडळींना चार गोड शब्द वापरायची कसली एवढी भीती वाटते काय माहीत? ते शब्द त्यांना सुचतच नाहीत का त्यांना त्यांची गरजच वाटत नाही का ते बोलायची लाज किंवा भीती वाटते, किंवा त्यात कमीपणा वाटतो, ह्यापैकी काय खरे आहे मला काहीच माहीत नाही.

मी मात्र कट्टर मराठी-संस्कृत वातावरणात वाढले तरी मला गोड शब्द बोलता येतात आणि ऐकायलाही आवडतात. म्हणूनच की काय, एक दिवस देवाला माझी दया आली असावी. त्यामुळेच गेली अनेक वर्षे मी कॅनडात जिथे केवळ फ्रेंच बोलले जाते त्या क्युबेक भागात रहाते. ह्या फ्रेंच भाषेची माझी ओळख झाली आणि खूप मस्त वाटले. romantic होतेच पण ते भाषेत व्यक्त करण्याची संधीही मिळाली. ज्याला प्रेम करता येते त्याला फ्रेंच भाषा लवकर शिकता येते, असे मला वाटते. फ्रेंच भाषा खूप मधुर. गोड गोड वाक्प्रचारांची त्यात रेलचेलच आहे ! एखाद्याचे म्हणणे ऐकतच बसावेसे वाटते. अगदी बस ड्रायव्हर पण रोज आपण बसमधून उतरताना "Merci, bonne fin de soirée, à demain" (धन्यवाद, तुमची उर्वरित संध्याकाळ सुखाची जावो. उद्या भेटू) असे दोन सेकंदात प्रत्येकाला गोंडसपणे बोलतो. अशी ही गोड गोड भाषा विशेषत: फ्रांस मध्ये असाल तर ऐकतच रहाविशी वाटते. आपण पाच गोड शब्द बोललो तर फ्रेंच मनुष्य पंधरा गोड शब्द बोलेल. त्यामुळे romantic, प्रेमळ, expressive असाल तर तुमचा अपेक्षाभंगच होणार नाही. तोटा एवढाच होतो की कधीकधी ह्या गोड गोड शब्दांच्या देवाणघेवाणीत मूळ मुद्दाच बोलायचा रहातो, किंवा विसरून जातो. जसे एखाद्या सुंदर युवतीला बघितल्यावर मागचे पुढचे काहीच आठवत नाही तसेच !

माझ्या प्रिय मित्रमैत्रीणींनो, मला सांगा, नवीन गोड गोड वाक्ये मराठीत निर्माण करण्याची आता गरज आहे असे तुम्हाला वाटते का? मला तरी तसे वाटते, कारण नवीन पिढी जुन्या पिढीपेक्षा वरवर तरी प्रेमळ झाली आहे. भावना प्रकट करायला नवीन पिढीला जास्त आवडते असे मला वाटते. अर्थात् इंग्लिश किंवा इतर भाषांतील वाक्यांचे शब्दश: भाषांतर करून वापरले तर हसायलाच येते. उदाहरणार्थ खालील इंग्लिश प्रेमळ वाक्यांना पर्यायी मराठी वाक्ये कोणती आहेत की जी आपल्याला अर्थ आणि भाव न बदलता, न हसता, वापरता येतील ?

I love you with all my heart = ?
Love at first sight = ?
Hugs and kisses = ?
I am so sorry = ?
Excuse me = ?
Pardon me = ?

"Excuse me" वरून एक किस्सा आठवला तो सांगून माझी आजची बडबड आटोपती घेते. माझी भाची सुमेधा ४-५ वर्षांची असताना एकदा मी तिला विचारले होते, "सुमेधा, excuse me चा नक्की अर्थ काय गं?" त्यावेळेस तिने लगेच उत्तर दिले: "excuse me" म्हणजे "बाजूला व्हा, बाजूला सरका".
हा किस्सा नंतर काही वर्षांनी मी मायकलला (माझ्या नव-याला) सांगत होते. मायकल अमेरिकन आहे आणि त्याला मराठी येत नाही. त्यामुळे त्यानी मला सुमेधाच्या "बाजूला व्हा, बाजूला सरका" चे इंग्लिशमध्ये भाषांतर करायला सांगितले. तर ते मी "get out of my way" असे केले, तर त्यावर तो एवढा हसला. तेंव्हापासून तो कॅनडात सर्वांना मजेने सांगतो की मराठीत "excuse me" च्या ऐवजी "get out of my way" अशा अर्थाचा वाक्प्रचार वापरतात. असो, एकदा केलेल्या भाषांतराचे परत मूळ भाषेत भाषांतर करताना माझी काय त्रेधातिरपीट होते ते त्याला कसे समजणार ?

-रत्नधा

टीप: सदर लेखात कुणाची वैयक्तिक थट्टामस्करी केली गेली असेल तर ती केवळ विनोदबुद्धीने समजून घ्यावी. "को" आडनावाच्या व्यक्तींनी कृपया क्रोध करू नये. लोभ असावा, ही नम्र विनंती.

कविता १ : ये उदयाला नवी पिढी

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥
ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी
अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी
रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!
स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!
काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते
अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते
नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥
कवि :वसंत बापट

कविता २ : नवे जुने

'नवीन काही गा हो आता
जुने-जुन्याचे चर्वण सरुद्या
प्रतिभेची पाखरे आपुल्या
नव्या नभामधुनी भिरभिरुद्या !

ती कमले ती, त्याच चांदण्या
तेच चांदणे, तोच सुधाकर
प्रेम तेच ते, त्या नवयुवती
ती कुसुमे अन् तो कुसुमाकर !

युगायुगांतुन घासत घोटत
टाकारीत आकारित बसली
कविकलमांची अफाट सेना
काव्यमूर्ति त्या जीर्णामधली ! '

प्रिय रसिका, हे खरे तुझे मत
मीहि असे जीर्णाचा वैरी
परि काळाच्या अतीत आहे
अनाद्यंत ही दौलत सारी !

प्रमदेच्या मधु अधरावरचे
ललित लालसर ते आमंत्रण,
चंद्र पुनेचा धरतीभवती
करितो जी स्वप्नांची गुंफण,

वैशाखांतिल पहाटवेळी
कूजन जे तीमिरांतुन वाहे,
सुगंध-सुंदरता सुमानांतिल
अथांगता जी गगनी आहे,

सौंदर्ये ही होतिल जेंव्हा
नीरस आणि असुंदर सखया,
त्याच क्षणी या संसारातिल
कविता अवधी जाईल विलया !

कवि : कुसुमाग्रज (१९४८)

उद्या भेटूच परत !

-रत्नधा

चार दिवस चार कविता- भाग ४ (समाप्ति)


माझ्या साहित्यप्रेमी मित्रमैत्रीणींनो,

आज "चार दिवस चार कविता" ह्या सदरातील माझा शेवटचा दिवस. आज मी तुम्हाला काही वैयक्तिक अनुभव सांगणार आहे. सुरुवात माझ्या लहानपणापासूनच करावी लागेल. मी जेंव्हा विमलाबाई गरवारे शाळेत होते तेंव्हा मला मराठी आणि भूगोल ह्या दोन विषयांची विशेष भीती वाटायची. त्यावेळेस मला मराठीच्या पेपराच्या आधी मदत करायला मुग्धा आणि तिची आई (मंगला काकू) ह्या दोघी धावून यायच्या. कितीतरी वेळ मी मुग्धाकडे मराठीचा अभ्यास करायला जायची. तरीही मराठीची परीक्षा जवळ आली की छातीत धडधडायाचे. कधी झोपही उडायची. क्वचित् कधी मानसिक ताणाने उलट्याही व्हायच्या. त्यावेळेस मात्र माझी मोठी बहीण कल्याणी मला खूप मदत करायची. विशेषत: कवितेच्या अभ्यासासाठी. मुग्धा, मंगला काकू आणि कल्याणी ह्या तिघींच्या अनेक प्रयत्नांनीच मी परीक्षेत पास व्हायचे.

आज ह्या गोष्टीला इतकी वर्षे उलटली तरी अजूनही कधीकधी रात्री स्वप्न पडते की ...माझा मराठीचा पेपर आहे. आणि "फुटक्या बुरुजाची कथा" किंवा "एका मातेचे आत्मवृत्त" किंवा "करावे तसे भरावे" किंवा "फाटक्या नोटेचा प्रवास," अशा काहीशा विषयावर निबंध लिहायचा असतो. आणि मग मात्र मला दरदरून घाम फुटतो. काहीच लिहायला सुचत नाही. वरील विषयांपैकी कोणता विषय जास्त जिव्हाळ्याचा वाटतोय तेच आधी कळत नाही. फुटका बुरुज, की एक माता ? फाटकी नोट की करावे तसे भरावे ? मनाची इतकी चलबिचल होते म्हणून सांगू ! शेवटी असे काहीसे सुचते की : एका मातेला फुटक्या बुरुजावर एक फाटकी नोट सापडली. ती तिने एका साधूला दान केली. मग "करावे तसे भरावे" ह्या न्यायाने तिला खूप सारे पुण्य मिळाले. अशी ही माझी गोष्ट तीन ओळींतच संपते. मग पुढे काय ? निबंध तर पानभर लिहायचा असतो. मी हताश होते. त्यावेळेस मी मुग्धा, मंगला काकू आणि कल्याणी ह्या त्रिमूर्तींची आठवण काढूनच चार पाच ओळी कशाबशा खरडते...स्वप्नातच...आणि तेवढ्यात घंटा वाजते. वेळ संपते. लगेच रिझल्ट लागतो आणि मी नापास झालेली असते... असे हे विचित्र स्वप्न आजवर मला कित्येकदा पडले आहे. अजूनही पडते. कुठेतरी मनात खोलवर, विशेषत: इतरांनी सुचवलेल्या विषयांवर, निबंध लिहिण्याची मला अजूनही खूप भीती वाटते. अगदी arranged marriage ची कशी भीती वाटायची तशीच. इतरांनी सुचवलेला नवरा करणे जसे मला अवघड वाटले, तसेच इतरांनी सुचवलेल्या विषयावर निबंध लिहिणेही अवघडच होते, अजूनही आहे !

मला आजही आठवते. एकदा मराठीच्या परीक्षेच्या आदल्या रात्री अगदी बारा वाजायच्या सुमारास कल्याणीने मला खालील कविता समजावली होती:

दास डोंगरी राहतो
साता समुद्रा वाहतो
घोंगावून लक्ष वारे
दुर्ग दुर्ग हादरतो

काही केल्या ती कविता मला समजतच नव्हती. मी तिला प्रश्न विचारत होते: "कोण हा दास ? तो डोंगरातच का राहतो ? आणि राहत असेल तर त्याचा दुस-या वाक्याशी काय संबध ? दासामुळेच सात समुद्र हलतात का? इ. इ." माझ्या प्रश्नांची उत्तरे देता देता कल्याणी बिचारी थकून जायची. त्यातून तिने मला ह्या कवितेत "दास म्हणजे रामदास," अशी काही महत्वाची गोष्ट सांगितल्यावर मला वरील कवितेतील दुर्गादुर्गांसारखे हादरायलाच व्हायचे, कारण मला जे स्पष्ट लिहीले नाही ते ओळखायचे कसे ते अजिबात कळायचे नाही.

शाळेत कवितांचा अभ्यास करताना बाईंना उमजलेला कवितेचा अर्थ समजून घेताना नाकी नऊ यायचे. त्यातून शाळेत प्रश्न असे विचारले जायचे की "अमुकतमुक कवितेत कविला काय सुचवायचे आहे?" मग झाली का पंचाईत ! असे वाटायचे की पाठ्यपुस्तकातील प्रत्येक कवितेच्या प्रत्येक कविच्या घरी जाऊन एकदाचे त्यालाच विचारावे की, "काय हो, अमुकतमुक कवितेत तुम्हाला नक्की काय सुचवायचे होते? आणि मग जर तसे सुचवायचे असेल तर ते स्पष्टच तसेच का नाही सांगितले?"

उदाहरणार्थ, "न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल," असे काहीसे संदिग्ध लिहून कविला काय साधायचे असते ? खरं तर वरील वाक्यात दोन असंबंधित सुटीसुटी वाक्ये एकाच ओळीत लिहून कविने वाचकाला कोड्यात टाकायचा प्रयत्न केला आहे.
१. हे डोळे नाही आहेत, हे झाले पहिले वाक्य.
२. कमळाच्या पाकळ्या उमलल्या आहेत, हे दुसरे वाक्य.
असे परीक्षेच्या पेपर मध्ये लिहीले तर मराठीच्या बाई ओरडायच्या आणि म्हणायच्या, "कविला असे म्हणायचे होते की एका स्त्रीचे डोळे उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे होते."
आता मलाच सांगा, "न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल" ह्या वाक्यात अचानक "एक स्त्री" कुठून आली ? बाईंच्या म्हणण्याप्रमाणे समजा आली असे मानूयात. पण वाचकहो, जर तुम्ही पुरुष असाल तर मला सांगा, जिचे डोळे उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांसारखे आहेत अशा एका तरी स्त्रीकडे तुम्ही ढुंकून तरी पहाल का? शक्यच नाही ! मग कविला असे म्हणायचे होते असे बाईंनाच वाटत असेल, कविला नाही. अशी मी समजूत करून घ्यायचे.

थोडक्यात काय, तर शाळेत कविता शिकणे हे माझ्यासाठी फारच अवघड काम होते. कारण अनेक कवितांत जे आहे ते "ते नाहीये ", आणि जे नाहीये ते "ते आहे" असे नानाविध मार्गांनी सांगितले जायचे. उदाहरणार्थ: केर हा केर नसून वारा असतो आणि वारा हा वारा नसून केर असतो. मग काढायाचा काय, केर की वारा ? ह्या गोंधळामुळेच मी साहित्य, कविता ह्यांपासून जरा दूरच राहू लागले. कारण तेंव्हा "चंद्र हा चंद्रच असतो. स्त्रीचे मुख हे तिचे मुखच असते. ह्या दोघांचा काहीही संबंध नसतो. आणि कमळ हे एक फूल असते. डोळे हा शरीराचा एक अवयव असतो. त्यामुळेच चंद्रमुखी, कमलनयन हे शब्द निरर्थक आहेत," अशा कृष्णधवल विचारसरणीची मी होते. मग साहित्यापासून जरा लांबलांबच अशी अनेक वर्षे गेली. आपण बरे आणि आपला मार्ग बरा म्हणून मी गणित, फिजिक्स अशा सोप्प्या विषयांचा अभ्यास करू लागले.

माझ्यात आमूलाग्र बदल होऊ लागला तो सुमारे एका वर्षापूर्वी. तोही बदल कवितेच्या संदर्भातच आहे. लहानपणापासून अनेक कविता कानावर पडल्या असल्या तरी कवितेचे माझे "प्रेमाचे" नाते जडले ते गेल्या वर्षी आई आजारी पडल्यानंतरच. पुढे आई वारली. मग माझे भावविश्वच जणू हादरले ! भावनांचे पूर येऊ लागले. एक वेळ अशी आली की आपल्याला कोणीच समजू शकणार नाही असे वाटू लागले. त्यावेळेस मनातले बरेवाईट विचार कागदावर उतरवू लागले. त्या विचारांच्या कविता बनू लागल्या. जेंव्हा खूप दु:ख, होतं, खूप प्रेम होतं, किंवा एखादी भावना खूप तीव्रतेने होते तेंव्हा जर तुम्ही साक्षर असाल तर त्या भावनांच्या मनांत कविताच होतात. त्या फक्त आपल्याला कागदावर लिहायच्या असतात. हे असे होत असेल कारण कदाचित् अशा वेळी आपणच आपल्याला ओळखत नसू. म्हणजे आपल्याला जसे आपण वाटत असतो तसे आपण नसतोच. जे आहे ते "ते" नाही आहे, असे वाटल्यावर कविताच होतात. विश्वास ठेवा माझ्यावर. मी स्वानुभवाने सांगत आहे. आई वारल्यानंतर कविता ही माझी अगदी जवळची मैत्रीण बनली. म्हणजे तुम्हाला कदाचित् वाटेल की मी तेंव्हापासून फार कविता वाचू वगैरे लागले ...तर तसे अजिबातच नाही. पण तेंव्हापासून मला हव्या त्या विषयावर कविता करण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे त्या आपोआपच होऊ लागल्या. इतरांच्या कवितांचे गर्भितार्थ समजून घेण्यापेक्षा कधी कधी स्वत: कविता करणे आणि इतरांना त्या समजून घेण्याचे अवघड काम देणे, हे सोपे वाटू लागले.

माझ्या कविता काही फार महान वगैरे नाहीत. पुष्कळशा वाचण्यासारख्याही नसतील. पण त्या माझ्या आहेत. ओबडधोबड, कंटाळवाण्या, बोजड असल्या तरी त्या माझ्या आहेत. त्या मला प्रकट करतात. त्या मला समजून घेतात. त्या माझे विचार मांडतात. आज त्या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी बनल्या आहेत आणि त्या मला मार्गदर्शन करतात, माझ्या भावंनाना वाट देतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रेष्ठ कविंच्या सुंदर सुंदर कवितांपेक्षा मला स्वत:च्या कवितांचा कसा काय आधार वाटतो म्हणून. तर गोष्ट अगदी साधी सोप्पी आहे. महान कविंच्या कविता सुंदर जरूर असतात आणि त्या जवळच्या वाटूही शकतात पण त्या "आपल्या" नसतात. जसे माधुरी दीक्षित गोड लावण्यवती जणू अप्सराच वाटते, पण ती आपली नसते. चित्रपटातल्या नायक नायिकेचे प्रेम उत्कट प्रशंसनीय नक्कीच वाटू शकते. पण तो आपला अनुभव नसतो. आपल्या अनुभवासाठी आपल्याला स्वत:लाच प्रेमात पडावे लागते; त्यात झोकून द्यावे लागते. किशोरी अमोणकर, कुमार गंधर्व ह्यांचे गाणे अफलातून सुंदर जरूर असते, पण आपल्या स्वत:च्या बाथरूममध्ये हंबरण्याने आपल्याला जो आनंद मिळतो तो त्यात नाही. सुंदर सुंदर देशातल्या निसर्गदृश्यांचे फोटो पाहून आनंद नक्की होतो. पण तिथे जाऊन ते अनुभवायाला मिळण्यात जी मजा मिळते ती कोणत्याच फोटोत नसते. त्यामुळेच तर आपल्यापैकी कुणीही फार अदभूत् गुणवान व्यक्ती नसले तरी आपल्याला आपली आई, आपले वडील, आपली मुले, आपला नवरा, आपली बायको, आपला प्रियकर, आपली प्रेयसी, इत्यादी जास्त सुंदर व गुणवान् वाटतात, कारण ते "आपले" असतात. म्हणूनच तर सावरकरांनी म्हटले आहे:

नभी नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे रम्य, परि मज भारी
आईची झोपडी प्यारी

तर सांगायचा मुद्दा हा, की अशा ह्या माझ्या कवितेने मला अवघड प्रसंगी सांभाळले. अजूनही सांभाळत आहे. जेंव्हा कोणत्याही मित्रमैत्रिणीला माझ्यासाठी वेळ नव्हता असे मला वाटत होते तेंव्हा ती माझ्यासाठी तत्परतेने धावून आली. त्यामुळे मी तिची शतश: ऋणी आहे.

माझ्या कविताप्रेमी मित्रमैत्रीणींनो, मी आज आपल्या सर्वांना असे आव्हान करते की आपले विचार कवितेत मांडूयात, आपल्या भावना प्रकट करूयात. भावनांचे लोणचे आणि मुरांबा घालणे आता पुरे झाले ! त्यांची छानशी झुळुझुळु वाहणारी नदी बनुद्या किंवा कोसळणारा धबधबा बनुद्या . यमक, वृत्त, छंद, भाषा, सोंदर्य ह्यांची भीती न बाळगता शब्दांच्या समुद्रात बेधडक उडी मारुयात. अगदी कुणाचीही पर्वा न करता ! पोहायला येते की नाही हे पहायला आधी पाण्यात उडी तर मारावी लागणारच ना ? आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांना छान कविता करता येतील. अगदी उत्तम नसतील तरी त्या आपल्याला आनंद देऊन जातील, कारण त्या आपल्या स्वत:च्या असतील. लोकांची जास्त पर्वा करू नका. लोक काय फार फार तर थट्टा करतील, दुर्लक्ष करतील, किंवा हसतील. पण कुणीतरी म्हटलेच आहे ना: "बोला हवे ते, मला काय त्याचे? पुरे जाणितो मीच माझे बल!"

"चार दिवस चार कविता" ह्या सदरात तुमचा निरोप घ्यायची वेळ आता जवळ आली आहे. गेले चार दिवस माझे छान आनंदात गेले आणि मी जे काही लिहीले ते तुम्ही कौतुकाने वाचल्याबद्दल, तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल मी तुमची आभारी आहे. ह्या चार दिवसांच्या माझ्या प्रयत्नांनंतर तुमच्या पैकी एकाला जरी माझ्यामुळे स्वत:ला कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली तरी माझा हेतू साध्य झाला, असे मला वाटेल. आणि हो, आपल्या लिखाणाला वाचक असावा असे सर्वांनाच वाटते. जर तुम्हाला कुणी वाचक भेटला नाही, तर बिनधास्त मला लिहा. मी अगदी प्रेमाने तुमचे लिखाण वाचेन. समजून घेईन.
तुमची शब्दप्रेमी,
रत्नधा

आज दोन कविता तुम्हाला सादर करत आहे.

१. तांबे ह्यांची ही कविता एकदम "cute" आहे. मला ती गुणगुणायला फार आवडते. शब्दांची लय, मांडणी, निवड, निष्पापपणा, नैसर्गिकता, सारेच फार फार आवडते.

हे कोण गे आई ?

नदीच्या शेजारी | गडाच्या खिंडारी
झाडांच्या ओळींत | वेळूंच्या जाळीत
दिवसा दुपारी | जांभळी अंधारी
मोडके देऊळ | त्यावरी पिंपळ
कोण गे त्या ठायी | रहाते गे आई? १

चिंचांच्या शेंड्यांना | वडाच्या दाढ्यांना
ओढोनी हालवी | कोण गे पालवी ?
कोण गे जोराने | मोठ्याने मोठ्याने
शीळ गे वाजवी ? पाखरा लाजवी ?
सारखी किती वेळ | ऐकू ये ते शीळ २

वाळली सोनेरी | पानें गे चौफेरी
मंडळ धरोनी | नाचती ऐकोनी !
किती मी पाहीले | इतकेची देखिले
झाडांच्या साउल्या | नदींत कापल्या !
हाका मी मारिल्या | वाकोल्या ऐकिल्या ३

उरांत धडधडे | धावता मी पडे
पळालो तेथून | कोण ये मागून ? ४

कवि : भा.रा.तांबे (१९०७)

२. मला आवडतेस

तुझी लाडीगोडी भाळते
थट्टामस्करीही आवडते
कविते, मला तू
फारच आवडतेस

तुझा नखरा, तुझा नाद
तुझा दर्द, शुद्ध भाव
शृंगार, बेशरमपणा
सारे कसे गोड वाटते
कविते, मला तू
भारी सुंदर वाटतेस

अलंकारांनी नटलीस
तर लई गोड दिसतेस
सजलीसवरली नाहीस
तरी मोहक तू असतेस

यमकछंदाने नक्कीच
गोजिरी तू दिसतेस
मुक्तछंद राज्यातही
पट्टराणी शोभतेस

शुद्धभावांची तू
नाजूकवेल
मन ज्याला त्याला
पाडीशी भुरळ

दुजाला अलगद
तुझ्या विश्वी नेतेस
मोहरून टाकतेस
मने जुळवतेस
कविते, मला तू
फारच आवडतेस

शब्दशस्त्राने कधी
खंजीर खुपसतेस
लाडीगोडीने कधी
प्रेमात पाडवतेस

सामर्थ्यशाली तू
मनमोहिनी तू
कविते, मला तू
फारच आवडतेस

-रत्नधा (२५ नोव्हेंबर २०१७)

Nov 21, 2017

एक वरीस सरलं

एक वरीस सरलं                      देवनदी जन्मदात्री                   
खूप काही गमावलं                   तुझं ऋण कसं फेडू?
तवस्मृतीच्या सरींनी                  काळजाचे पाणीपाणी
मन न्हालं चिंब झालं  १              तुजवीण कशी रडू?  ७

तवप्रीतीची गं नाळ                   तुझं कोड कवतुक
कशी तुटता तुटेना                    कधी नाही बघ केलं
प्रेमरज्जुंची ही वीण                   मला क्षमा कर माते
कशी घट्ट उसवेना  २                सारं कसं राहुन गेलं  ८

आई ध्यानी आई मनी              आई तुझी आठवण
आई स्वप्नी अंतर्मनी                 येताजाता येई मनी
आठवते सदा आई                  आई तुझी शिकवण
जिथेतिथे कशी आई?  ३          असो ध्यानी मनोमनी  ९

तवस्मरणाची ज्योत                 तुझी लेक तुझी छाया
सदा हृदयी राहील                  मजवर तुझी माया
तुझ्या गुणांचे गुंजन                 तुझी काया पडछाया
मनोमनी ती करील  ४             तुजवर माझी माया  १०

कामधेनु जणु माय                  आशीर्वाद तुझा माते
सदा स्मृतीत राहील                सदा पाठीशी राहुदे
तिच्या ममतेची नदी                तुझे प्रेम तुझी कृपा
चित्त पावन करील  ५              पुत्रपौत्रांवर असुदे  ११

आई पृथ्वी सुरसरि                  एक वरीस सरलं
माय काय तुला म्हणू?             कसंबसं म्होरं गेलं
तव उदरी जन्म मिळे              सुख जणु दुरावलं
माझे भाग्य काय जाणू?  ६       मन अंतर्मुख झालं १२