दिसलीस सखे तू जेंव्हा
नव्हते का मन था-यावर?
अन दखल तुझी घेण्याचे
सुचले ना मजला तेंव्हा
तू अवचित का आलीस?
कळून का, तुलाही नकळत?
साक्षात पुढे गत विश्व
मन क्षुब्ध नि भावही मुग्ध
ठरवून विसरलो होतो
ठरवून विसरलो होतो
ते दग्ध कलह अन तंटे
पाहता अचानक तुजला
तुटतुटले बांध नि संयम
आलीस तशी गेलीस
आलीस तशी गेलीस
कळून का, तुलाही नकळत?
नजरेतून देऊन जहर
हृदयावर कशास वार?
किती मूक शब्द बरसले
कवितेत शोधला आसरा
एकेक शब्द पाझरला
मल्हार मनी कोसळला
कवितेतच न्हालो भिजलो
कवितेतच न्हालो भिजलो
शब्दांतच शोधत बसलो
निसटले भाव ओंजळीतून
सुख कणभर अन बहु दु:ख
हरलो मी हरलीस तू ही
हरलो मी हरलीस तू ही
ह्या क्षणिक दुष्ट संसारी
जनरीत कुणी म्हणती ही
कोणासच चुकली नाही
No comments:
Post a Comment